Friday, March 10, 2023

“चंद्रामृत भाग २”

 


व्याख्याते, प्रवचनकार यांच्यासाठी उपयुक्त पुस्तक “चंद्रामृत भाग २”

सौ. रोहिणी पांडे, पुणे 

 

          सुप्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांच्या सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लेखणीतून साकारलेले एक निर्व्याज मनोरम पुस्तक म्हणजे चंद्रामृत भाग २. डॉ. शास्त्रींची अनेक व्याख्याने, प्रवचने सातत्याने होत असतात. तसेच अनेक वृत्तपत्रांमधून आणि समाज माध्यमात देखील ते सातत्याने लेखन करतात. या व्याख्याने, प्रवचने आणि लेख यांच्यावर आधारित पुस्तक म्हणजे चंद्रामृत भाग २ होय.

          या पुस्तकात विविध विषयांवरील शास्त्रीजींचे लेख आणि मुलाखत यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचा थोडक्यात सारांश असा की,

श्रीगणेशवन्दनम्

         “कलौ चण्डीविनायकौ |” असे शास्त्रवचन आहे. अर्थात कलियुगात भगवान श्रीगणेश आणि भगवती चंडिकादेवी यांच्या उपासनेचे अत्यधिक महत्व आहे. अनेक प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक ग्रंथांमध्ये भगवान श्री गणपतीचे वंदन, स्तवन, स्तोत्र, अष्टक अनेक भाषांमध्ये आपल्याला आढळते. या पार्श्वभूमीवर आपण देखील गणरायाच्या चरणी आपली सेवा रुजू करावी, या हेतूने या वंदनात्मक स्तोत्राची रचना डॉ. शास्त्रींकडून  भगवंतांनी करवून घेतली आहे. त्या रचनेचा समावेश या लेखात आहे.

आनंद रामायणातील श्रीरामाष्टक

          संस्कृत, हिंदी, मराठी या भाषेतील अनेक काव्ये ही रामायणावर आधारित आहेत. रामायणाची साहित्यिक उपजीव्यता अद्वितीय अशा प्रकारची आहे. समर्थ श्री रामदास स्वामी, श्रीधरस्वामी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अशा अनेक साधू संतांनी मराठीभाषेतून रामायणाची, रामनामाची महती सांगितली आहे. श्रीराम कथेतील तत्त्व हे नित्य अशा प्रकारचे आहे. त्याची मांडणी कालानुरूप होणे आवश्यक असते. आणि तशी ती प्रभू रामरायांच्या कृपेने झाल्याचे दिसून येते. संत तुलसीदास यांचे नंतर देखील हिंदीतही ती मालिका सुरूच राहिली. राष्ट्रकवी मैथिलीशरण यांनीही आधुनिक काळात काव्याच्या माध्यमातून राम कथा गायिली आहे. रामायणाच्या या मालिकेत आनंद रामायण देखील प्रसिद्ध आहे. प्रस्तुत रामायणात भगवान श्रीरामाचे नितांत सुंदर असे अष्टक येते. या अष्टकाचे निरुपण या लेखात आहे.

शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥

          जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून अगदी प्रासादिक शब्दांमध्ये मारुतीरायांच्या विषयीचा आपला आदरभाव व्यक्त केला आहे. या अभंगाचे निरुपण या लेखात आहे.

“सार्थ बोधवचने” प्रकाशन

          प्रा. डॉ. दत्तात्रय तापकीर यांच्या सार्थ बोधवचने या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शास्त्रींच्या हस्ते पार पडले. त्या प्रसंगीच्या व्याख्यानाचा सारांश या लेखात आहे.

संस्कृत भाषा प्रचारिणी सभा: प्रज्ञाभारति पुरस्कारानिमित्त संबोधन

          नागपूर येथील प्रतिष्ठित अशा संस्कृत भाषा प्रचारिणी सभा यांचेकडून डॉ. शास्त्रींना प्रज्ञाभारति पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगीच्या व्याख्यानाचा सारांश या लेखात संस्कृत भाषेत आहे.

ला, माणूस होऊ या.

          "केवळ स्वतः नाही, आपल्या समवेतची प्रत्येक व्यक्ती आनंदी असायला हवी." असं ज्याला वाटतं तो माणूस. पण माणसाच्या या माझ्या व्याख्येत जगातील किती टक्के मनुष्याकृती प्राणी येतील, प्रश्नच आहे. खरं तर भगवंताची सर्वात सुंदर कलाकृती म्हणजे माणूस.

सुखाचं गणित

          गणित कितीही अवघड असो, सोपं असो किंवा लहान मोठं असो; ते फक्त ०१२३४५६७८९ या दहा अंकांभोवतीच भ्रमत असतं. माणसाचंही असंच असतं. या विषयीचे निरुपण या लेखात आहे.

परस्परावलंबित्व, माणूस आणि आनंदाचा मार्ग.

        मानवच काय, अगदी पशु पक्षी वनस्पती सर्वांचेच जीवन हे तसे कॉम्प्लेक्स असते. आणि याचे एक प्रमुख कारण परस्परावलंबित्व असण्याची शक्यता आहे. गरजा कितीही कमी असो किंवा अधिक; त्यांची पूर्तता करण्यासाठी अन्य कोणावर तरी अवलंबून रहावे लागते. माणसाच्या या सुंदर स्थितीचा मागोवा या लेखात आहे.

हसायला लावणारी माणसं...!

          एका सज्जन व्यक्तीच्या बाबतीत मी असे निरीक्षण केले की, हसायला लावणा-या प्रेमळ माणसांनी अशी काही साथ दिली की, वेळ फक्त हसण्यासाठीच राहीला. एखाद्या कुशल डॉक्टर सारखं हसत हसवत हृदय बाहेर काढलं. कॉर्बोरेटर ऑईलनं साफ करावं, तसं आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या स्निग्धतेने हृदय स्वच्छ केले. आणि निखळ हास्य तेवढं हृदयात ठेवलं. अशा सकारात्मक माणसांविषयीचे चिंतन या लेखात आहे.

आधुनिक तंत्रज्ञान संस्कृत भाषेला पोषक!

          केवळ भारतीयच नव्हे, तर मॅक्समुलर, गटे, शोपेनहावर प्रभृती पाश्चात्य विचारवंतांना देखील संस्कृत साहित्याने प्रभावित केले होते. भारतातीलच नव्हे, तर जगातील एक प्राचीन भाषा म्हणून संस्कृत भाषेची ओळख आहे. श्रावण पौर्णिमेला सर्वत्र संस्कृतदिन साजरा केला जातो. त्या निमित्त संस्कृत भाषेचे अभ्यासक, कवी, आणि संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे पुरस्कर्ते प्रा. डॉ. चंद्रहास सोनपेठकर यांची विशेष मुलाखत या लेखात आहे.

भाषा विचार

सामान्यत: विचार अभिव्यक्त करण्याचे साधन अशी परिभाषा ‘भाषा’ या संज्ञेची केली जाते. “ भाषा-विचार” या लेखात आपल्याला भाषा, मराठी भाषा आणि त्यातील विविध शब्द तसेच त्यांचे व्युत्पत्यर्थ, शुद्धलेखन इत्यादी विषयांचा विचार या लेखात मांडला आहे..

भाषा विचार

          महर्षी पतंजलींना आपण योगसूत्रकार म्हणून ओळखतो. ते व्याकरणकार देखील होते. त्यांचा व्याकरणमहाभाष्य नामक ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी भाषेची व्याख्या दिली आहे, ती पुढीलप्रमाणे,

“व्यक्ता वाचि वर्णा येषां त इमे व्यक्त वाच|”

अर्थात भाषा हे एक साधन आहे, ज्यामुळे माणूस आपले विचार अन्य लोकांसमक्ष स्पष्टपणे प्रकट करू शकतो आणि अन्य लोकांचे विचार स्पष्टपणे समजू शकतो. या व्याख्येचे निरूपण या लेखात आहे.

“विद्यार्थ्याला निर्भय वाटलं पाहीजे.”

          संस्कृत कवी, सुप्रसिद्ध व्याख्याते, आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी ओळख असलेले डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांच्या अध्यापन कार्यास यावर्षी १६ वर्षे पूर्ण झाल्या निमित्तची विशेष मुलाखत येथे देण्यात आली आहे.

राष्ट्रकवि श्रद्धेय अटलजी

अटलजींना भारतरत्न मिळाले. खरं तर अटलजींच्या रूपाने भारतदेशाला रत्न मिळालेच होते. ते रत्न आहे, यास एक वैधानिक मान्यताच जणू भारतरत्न पुरस्काराने दिली आहे. श्रद्धेय अटलजींविषयीच्या डॉ. शास्त्रींचे भावविश्व या लेखात प्रकटले आहे.

ती शाबासकीची थाप......!

          नामवंत व्याख्याते, निरुपणकार असे आदरणीय विवेकजी घळसासी. शास्त्रींच्या हृदयात अक्षय अशा प्रकारचा आदर असणारं हे व्यक्तिमत्व. आदरणीय विवेकजी यांच्या विषयीचे डॉ. शास्त्रींचे भावविश्व या लेखात प्रकटले आहे.

संत साहित्यातील गीता महात्म्य

          वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवरील एक क्रांतिकारी असा संप्रदाय आहे. वेदांत संप्रदायाचे अधिष्ठान या संप्रदायाला आहे. ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि गीता अशी वेदांत तत्त्वज्ञानाची प्रस्थानत्रयी मानली जाते. वारकरी संप्रदायात देखील श्रीमद्भगवद्गीतेचे आत्यंतिक अशा प्रकारचे महत्व आहे. कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी श्रीमद्भगवद्गीतेवर भावार्थदीपिका नावाची टीका लिहिली. तोच ग्रंथ पुढे ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध झाला. अशा प्रकारे विविध संतांच्या अभंगांतून व्यक्त होणारे गीता महात्म्य या लेखात निरूपित करण्यात आले आहे.

अध्यक्षीय प्रास्ताविक

          संस्कृत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थान डॉ. शास्त्रींनी भूषविले. त्यावेळी केलेले प्रास्ताविकपर संस्कृत व्याख्यानाचा सारांश या लेखात आहे.

पहिले प्रवचन

          चंद्रहास शास्त्रींनी वयाच्या चौथ्या वर्षी संत श्री ज्ञानेश्वर माऊली जन्मस्थान, आपेगाव येथे पहिले प्रवचन केले. त्याची ही हृद्य आठवण आणि वै. गुरुवर्य श्री. विष्णूमहाराज गुरुजी कोल्हापूरकर यांच्या विषयीची कृतज्ञता या लेखात व्यक्त करण्यात आली आहे.  

आधुनिक केसरी परिवार: एक छान अनुभव

          डॉ. शास्त्री आधुनिक केसरी वृत्तपत्रातून सातत्याने लेखन करतात. या वृत्तपत्राच्या व्यवस्थापन आणि संपादन यांच्या बाबतीतील सकारात्मक अनुभवाचा आलेख या लेखात मांडण्यात आला आहे.

          अर्थातच हे पुस्तक वाचताना देखील आपण शास्त्रीजींचे व्याख्यान ऐकत आहोत, असे वाटते, इतके हे लिखाण प्रभावी आणि सहजतापूर्ण आहे. संस्कृत अध्यापिका आणि अभिज्ञान, पुणे च्या संचालिका सौ. मानसी चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक ऋचा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

          चंद्रहास शास्त्री यांच्या अमृततुल्य शब्दांनी ओथंबलेले हे चंद्रामृत रसिकांना नक्कीच आवडेल.

चंद्रामृत भाग २

शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद

पृष्ठे ६५

किंमत १५०

 

 

 

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...