Friday, March 31, 2023

|| श्रीरामचद्रं सततं नमामि ||

 


|| श्रीरामचद्रं सततं नमामि ||

डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 

राम कथा गिरिजा मैं बरनी। कलि मल समनि मनोमल हरनी॥
संसृति रोग सजीवन मूरी। राम कथा गावहिं श्रुति सूरी॥

अर्थात भगवान श्री शंकर पार्वतीमातेस म्हणतात की, “हे गिरिजे, कलियुगाच्या पापांचा नाश करणारी, मनाचे मळभ दूर करणारी अशी पतितपावनी रामकथा मी वर्णिली. ही रामकथा जन्म-जरा-मरण या रोगासाठी संजीवनी वनस्पतीप्रमाणे आहे, असे वेद आणि विद्वज्जन सांगतात.

         असे मनोरम वर्णन श्रीरामकथेचे करण्यात येते.

पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदं।
मायामोहमलापहं सुविमलं प्रेमाम्बुपूरं शुभम्‌।
श्रीमद्रामचरित्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ये
ते संसारपतंगघोरकिरणैर्दह्यन्ति नो मानवाः॥

श्रीरामचरित्ररूपी मानसाची महती या नितांत सुंदर अशा श्लोकात सांगितली आहे. हे श्री रामचरितमानस पुण्यरूप आहे. पापांचे हरण करणारे आहे. नित्य कल्याणकारी आहे. विज्ञान आणि भक्ती देणारे आहे. माया-मोह-मल दूर करणारे आहे. परम निर्मलरूपी जलाने परिपूर्ण आणि मंगलमय असे आहे. जो मनुष्य भक्तिपूर्वक या मानससरोवरामध्ये निमज्जन करतो, त्याला संसाररूपी सूर्याची प्रचंड किरणे जाळीत नाहीत.

         असे थोर महात्म्य श्रीरामकथेचे आहे.

यावत् स्थास्यन्ति गिरयस्सरितश्च महीतले ।
तावद्रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ॥
- वाल्मीकिरामायणम् १.२.३६

जो पर्यंत या भूतलावर पर्वत आहेत, नद्या आहेत, अर्थात जो पर्यंत ही सृष्टी आहे, तो पर्यंत या रामायणकथेचा लोकांमध्ये प्रचार होत राहील.

         असे वर्णन श्रीवाल्मीकीरामायणात देखील मिळते.

         संस्कृत, हिंदी, मराठी या भाषेतील अनेक काव्ये ही रामायणावर आधारित आहेत. रामायणाची साहित्यिक उपजीव्यता अद्वितीय अशा प्रकारची आहे.

         समर्थ श्री रामदास स्वामी, श्रीधरस्वामी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अशा अनेक साधू संतांनी मराठीभाषेतून रामायणाची, रामनामाची महती सांगितली आहे. श्रीराम कथेतील तत्त्व हे नित्य अशा प्रकारचे आहे. त्याची मांडणी कालानुरूप होणे आवश्यक असते. आणि तशी ती प्रभू रामरायांच्या कृपेने झाल्याचे दिसून येते. संत तुलसीदास यांचे नंतर देखील हिंदीतही ती मालिका सुरूच राहिली. राष्ट्रकवी मैथिलीशरण यांनीही आधुनिक काळात काव्याच्या माध्यमातून राम कथा गायिली आहे.

        रामायणाच्या या मालिकेत आनंद रामायण देखील प्रसिद्ध आहे. प्रस्तुत रामायणात भगवान श्रीरामाचे नितांत सुंदर असे अष्टक येते.

॥ अथ रामाष्टकम् ॥

श्रीशिव उवाच ।

भगवान श्रीशिवजी म्हणतात-

सुग्रीवमित्रं परमं पवित्रं सीताकलत्रं नवमेघगात्रम् ।

कारुण्यपात्रं शतपत्रनेत्रं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥१॥

सुग्रीवाचे मित्र, परम पवित्र, सीताकांत, नवमेघाप्रमाणे कांती असणारे, कारुण्यनिधी आणि कमलदलाप्रमाणे नेत्र असणारे अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

संसारसारं निगमप्रचारं धर्मावतारं हृतभूमिभारम् ।

सदाविकारं सुखसिन्धुसारं श्रीरामचद्रं सततं नमामि ॥२॥

ज्यांनी भूमीचा भार हरण केला आहे, जे धर्माचे अवतार आहेत, जे अखिल विश्वाचे सार आहेत, ज्यांच्याविषयी वेद कथन करतात, जे सदैव अविकारी आहेत, जे सुखसिंधुचे म्हणजे आनंदसागराचे सार आहेत, अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

लक्ष्मीविलासं जगतां निवासं लङ्काविनाशं भुवनप्रकाशम् ।

भूदेववासं शरदिन्दुहासं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥३॥

लक्ष्मीपती, अखिल विश्वामध्ये भरून राहणारे, लंकेचा नाश करणारे, जगाला आनंदित करणारे, संतांच्या द्वारे ज्यांचे ध्यान केले जाते, शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे हास्य असणारे अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

मन्दारमालं वचने रसालं गुणैर्विशालं हतसप्ततालम् ।

क्रव्यादकालं सुरलोकपालं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥४॥

मंदार पुष्पांची माळा धारण करणारे, रसपूर्ण वाणीचे उच्चारण करणारे, गुणांनी विशाल असणारे, एका बाणात सप्त ताल वृक्ष छेदणारे अर्थात सर्वश्रेष्ठ धनुर्धर, असुरान्तक, देवांचे रक्षणकर्ते, अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

वेदान्तगानं सकलैः समानं हृतारिमानं त्रिदशप्रधानम् ।

गजेन्द्रयानं विगतावसानं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥५॥

उपनिषदे ज्यांची स्तुती गातात, जे सर्वांना समानतेने वागवितात, ज्यांनी शत्रूचे गर्वहरण केले आहे, देवांचे मुख्य असे, गजेंद्राधिरूढ, अभयदान देणारे, अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

श्यामाभिरामं नयनाभिरामं गुणाभिरामं वचनाभिरामम् ।

विश्वप्रणामं कृतभक्तकामं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥६॥

मेघ:श्यामल अशी सुंदर कांती असणारे, नयनरम्य रूप असणारे, गुणांचे निधान असणारे, सुंदर म्हणजे मधुर, रसाळ, पवित्र आणि सत्य वचन बोलणारे, ज्यांचेसमोर अखिल विश्व नतमस्तक होते, भक्तांची कामना पूर्ण करणारे, अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

लीलाशरीरं रणरङ्गधीरं विश्वैकसारं रघुवंशहारम् ।

गम्भीरनादं जितसर्ववादं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥७॥

लीलाशरीरधारी अर्थात अवतारी, युद्धात सदैव विजयी, विश्वाचे सार, रघुवंशाचे मेरुमणी, प्रगल्भ ध्वनी असणारे, सर्व युद्धात विजयश्री प्राप्त करणारे, अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

खले कृतान्तं स्वजने विनीतं सामोपगीतं मनसा प्रतीतम् ।

रागेण गीतं वचनादतीतं श्रीरामचन्द्रं सततं नमामि ॥८॥

दुष्टनिर्दालक, स्वजनांप्रति विनयी, सामोपगीत असे मनाला प्रतीत होणारे, प्रेमाने ज्यांची स्तुती गायिली जाते असे वचनांच्या द्वारे अवर्णनीय असे ज्यांचे महात्म्य आहे, अशा श्रीरामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो.

श्रीरामचन्द्रस्य वराष्टकं त्वां मयेरितं देवि मनोहरं ये ।

पठन्ति शृण्वन्ति गृणन्ति भक्त्या ते स्वीयकामान् प्रलभन्ति नित्यम् ॥९॥

हे देवी, श्रीरामचंद्रांचे श्रेष्ठ असे हे मनोहारी अष्टक मी तुला सांगितले आहे. जे लोक भक्तीपूर्वक हे अष्टक वाचतात, ऐकतात, गातात त्यांची सर्व मनोरथे नित्य सफल होतात.  

 

॥ इति शतकोटिरामचरितान्तर्गते श्रीमदानन्दरामायणे वाल्मीकीये सारकाण्डे युद्धचरिते द्वादशसर्गान्तर्गतं श्रीरामाष्टकं समाप्तम् ॥

अशा प्रकारे शतकोटीरामचरितामधील श्रीमद् आनंद रामायणातील वाल्मीकीय सारकांडातील युद्धचरितातील द्वादश सर्गातील श्रीरामाष्टक आहे.

        एकूणच आनंद रामायणातील नितांत सुंदर असे हे श्रीरामाष्टक आहे. याचे काही पाठभेद देखील असण्याची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी हे अष्टक संस्कृतात उपलब्ध आहे. वाचकांसाठी मराठी अनुवाद देण्याचा प्रयत्न केला आहे. जर काही त्रुटी असतील, तर अभयदान आणि शरणदान देण्यासाठी ज्यांची विशेष ख्याती आहे, असे लोकप्रभू श्रीरामराय क्षमा करतील आणि झालेली सेवा गोड मानून घेतील, अशी श्रद्धा आहे.

इति लेखनसीमा |

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...