Tuesday, May 9, 2023

कृतार्थ जीवनाची भारतीय संकल्पना

 


कृतार्थ जीवनाची भारतीय संकल्पना

भारतीय लोक कृतार्थ जीवन कशाला म्हणतात? जीवनाच्या कृतार्थतेची लक्षणे कोणती? अवश्य वाचा, परीक्षण करा. पटले, तर शेअर करा.


अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम् । 

देहान्ते तव स्मरणं, देहि मे परमेश्वर ||

कृतार्थ जीवनाची ही भारतीय संकल्पना आहे. जीवन दैन्याविना व्यतीत करता यावे. कोणत्याही रोग किंवा व्याधी यांच्या शिवाय मरण यावे आणि मरताना परमेश्वराचे स्मरण असावे, अशी प्रार्थना या श्लोकात करण्यात आली आहे. 


अनायासेन मरणम् :

अर्थात कष्टाशिवाय मरण. स्वर्ग किंवा नरक याविषयी अनेकदा आपण ऐकतो. परंतु एखाद्या व्याधीग्रस्त माणसाला विचारले, तर तो सांगेल की, आरोग्य हा स्वर्ग आहे. आणि अनारोग्य म्हणजे रोगपीडा या नरक यातना आहेत. आरोग्य संपन्न व्यक्ती आरोग्याचे जेवढे महत्व जाणतो, त्यापेक्षा आरोग्याचे महत्व एखादी व्याधीग्रस्त व्यक्ती तुम्हाला सांगू शकेल. अशा प्रकारच्या कोणत्याही व्याधीशिवाय मरण यावे, अशी प्रार्थना या श्लोकात करण्यात आली आहे.


विना दैन्येन जीवनम् :

दैन्य म्हणजे दुर्बलता. ही दुर्बलता आर्थिक असू शकते. शारीरिक असू शकते. सामाजिक असू शकते. आर्थिक चणचण हा दैन्याचा भाग आहे, तसेच तुम्ही कितीही यशस्वी झालात, तरी तुमचे कौतुक करणारे लोक नसणे किंवा संख्येने कमी असणे, हा दैन्याचा भाग आहे. तुम्हाला सतत एखाद्या व्यक्तींचा व्यक्ती-समूहाचा द्वेष करावा लागणे, हा सुद्धा वैचारिक म्हणा किंवा मानसिक दैन्याचा भाग आहे. अशा दैन्याशिवाय जीवन जगता यावे, अशी प्रार्थना या श्लोकात करण्यात आली आहे. महाभारतात दुर्योधनाकडे आर्थिक दैन्य नव्हते, पण तो पांडूपुत्रसमूहाचा म्हणजे पांडवांचा द्वेष करीत असल्याचे दिसून येते. म्हणजे त्याच्याकडे बंधुभावाच्या अभावाच्या विषयक दैन्य होते, असे म्हणता येईल.


देहान्ते तव स्मरणम् :

देह सोडताना परमेश्वराचे स्मरण घडून आले पाहिजे. मात्र ही गोष्ट तेवढी सोपी नाही. आयुष्यभर ज्या चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा ध्यास तुम्ही घेतला आहे, त्याचेच स्मरण तुम्हाला अंतकाळी घडणार आहे. म्हणून आयुष्यात निरंतर नामस्मरण केले, तरच अंतकाळी भगवंतांचे स्मरण घडून येईल. अन्यथा पुढच्या पिढीविषयी चिंता, काळजी करीत असताना किंवा अप्राप्त विषयाबद्दलच्या असमाधानी अवस्थेत प्राण पाखरू उडून जाऊ शकते. सारांशत: एक कृतार्थता अंतिम समयी असली पाहिजे, अशी प्रार्थना या श्लोकात करण्यात आली आहे. 


देहि मे परमेश्वर :

कष्टाशिवाय मरण, दैन्याशिवाय जीवन, देह सोडताना परमेश्वराचे स्मरण या तीनही गोष्टी प्राप्त करणे म्हणजे खऱ्या अर्थाने कृतार्थ जीवनाची संकल्पना साकार होणे आहे. या तीनही गोष्टी प्राप्त करण्यासाठी निरंतर प्रयत्न आवश्यक आहेत. अशा प्रकारचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना परमेश्वराचे कृपाशीर्वाद असणे आवश्यक आहे. म्हणून या तीनही गोष्टी परमेश्वराने आपल्याला द्याव्यात, अशी प्रार्थना या श्लोकात करण्यात आली आहे. 

इति लेखनसीमा!


(पोस्ट आवडल्यास forward किंवा कॉपी पेस्ट करून पुढे पाठवू शकता.)

No comments:

Post a Comment

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...